प्रभारी ठाणेदाराच्या बदलीचे आदेश धडकताच माहूर शहरात ‘मटका’ खेळ जोमात सुरू….
"सपोनि. मुळे यांच्या बदलीने दोन नंबरवाले सुखावले; एलसीबीच्या नावाखाली खाजगी एजंटकडूनही जोरात वसूली...."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
मागील अनेक महिण्यांपासून अल्प प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे माहूरच्या प्रभारी ठाणेदाराच्या बदलीचे आदेश धडकताच शहरात मटका पुन्हा एकदा बिनदिक्ततपणे सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत असून विश्रामगृह रोडसह आठवडी बाजार परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या या खेळाचे जनक सपोनि मुळे यांच्या बदलीने आघोरी सुखाचा अनुभव घेत आहेत….
माहूर शहरातील अवैध धंद्यांवर अंकुश लागावा यासाठी खास करून सपोनि शिवप्रकाश मुळे यांना ठाण्याचे प्रभारी म्हणून खास नेमणुक देण्यात आली होती… तदनंतर मुळे यांच्या कडक धोरणामुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणून सुरू असलेले अवैध धंदे हे छुप्या पद्धतीने किंबहुंना बंदच करण्याची नामुष्की अवैध धंदेवाईकांवर येवून ठेपली होती.. परिणामी अनेकांनी उचापतीचे व्यवसाय बंद किंवा शांत ठेवण्यातच धन्यता मानली…
दरम्यान महाराष्ट्र पोलीस विभागाचे राजपत्रतील अनुक्रमांक १३५ मधील नोंद व उपरोक्त आदेशानुसार माहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी मुळे यांची बदली अमरावती परिक्षेत्रात झाल्याचे आदेश दि. २७ मे २०२५ रोजी धडकले आहेत.. परिणामी माहूर शहरासह पोलीस ठाणे क्षेत्रातील सर्व ठिकाणचे अवैध व्यावसायिक जागृत झाल्याचे दिसून येत असून ठाणे क्षेत्रातील इतर ठिकाणच्या उचापतीधारकांचे काहीही असले तरी माहूर शहरातील विश्रामगृह रोड तसेच आठवडी बाजार परिसरात मटका टेबल पुन्हा एकदा बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे दिसून येत असल्याने अवैध धंदेवाईकांत आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे….
“विशेष म्हणजे शहरासह माहूर तालुक्यातील तमाम अवैध धंदेवाल्याच्या नावांची यादी घेवून तालुक्यातीलच एक खाजगी एजंट सर्व अवैध धंदेवाल्यांकडून ‘एलसीबी’ च्या नावाखाली “चंदा” गोळा करीत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एकाने सांगितले आहे.. तर त्याच इसमाचा “हप्तारूपी वसूलीचा प्रसाद” घेतानाचा फोटो गोपनीयरीत्या समाजमाध्यमांवरही फिरत आहे.. त्यामुळे हा वसूली करणारा खाजगी एजंट नेमका कुणाचा..? याबाबत विविध तर्कवितर्कांना उधान आले असून माहूर पोलीसांच्या ‘स्वप्नाच्या दुनिये’तील शहरातील सर्व अवैध व्यवसाय बंद असताना हा खाजगी एजंट माहूर शहरासह ठाणे क्षेत्रातील जवळपास सर्वच ठिकाणच्या अवैध व्यवसायधारकांकडून तगडी वसूली करत असेल तर मग “कानात विड्या” नेमक्या कुणाच्या माहूर पोलीसांच्या..? की जनतेच्या..?? याबाबत रंजक चर्चांना उधान आले आहे…

