‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं..!’ घोषणेने माहूर दणाणले…
"मराठा आरक्षणासाठी शहर कडकडीत बंद; व्यापारी, दुकानदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(जयकुमार अडकिने)
माहूर….
दि. १२ सप्टेंबर २०२६ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत माहूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, दुकानदारांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठा दिवसभर बंद राहिल्या. बंदमुळे बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने माहूरमध्ये पुन्हा एकदा जोर धरला असून, ‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, शासनाने समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरातील विविध भागांतील दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. बंदला व्यापारी आणि दुकानदारांनी दिलेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाच्या भावना तीव्र असल्याचे या बंदमधून स्पष्ट झाले.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. बंददरम्यान शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहिली माहूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडो मराठा नागरिक आंदोलनात सहभागी झाले.





