(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
वाई बाजारातील बहुचर्चित दारूबंदी आंदोलन आता राजकीय वळण घेत असून यातूनच दारूबंदी समर्थक व विरोधक महिलांचे दोन गट तांत्रिकदृष्ट्या आमने-सामने येवून एका गटाने दारूबंदीच्या समर्थनार्थ जिल्हाधिका-यांना तब्बल एक हजारावर महिलांच्या स्वाक्ष-या असलेले निवेदन दिल्यानंतर आता महिलांच्या दुस-या एका गटानेही जिल्हाधिका-यांना लेखी निवेदन देवून दारूबंदीसाठी घेतलेल्या स्वाक्ष-या चक्क खोट्या व दिशाभुल करून घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे वाई बाजारच्या बहुचर्चित दारूबंदी आंदोलनाला राजकीय वळण मिळाल्याचे दिसून येत असून संंपुर्ण दारूबंदी आंदोलन आता वादाच्या भोव-यात अडकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे..
वाई बाजार येथील दारूबंदीसाठी दि. १२ डिसेंबर रोजी तब्बल एक हजार महिलांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन ग्रामपंचायत पुरस्कृत दारूबंदीसमर्थक महिलांच्या एका गटाने जिल्हाधिका-यांना दिले होते. यावेळी निवेदन देवून दारूबंदीसाठीच्या पुढील प्रक्रियेस गती द्यावी. तसेच येथील संपुर्ण दारूबंदी करावी अशी मागणी केली होती… तर दुसरीकडे वाई बाजार ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर निवडणुकीदरम्यान झालेल्या मतभेदातून दारूबंदीचे आंदोलन राबवताना आमच्या सह्यांचा गैरवापर झालेला असल्याचा आरोप करताना चाळीस सदस्यीय महिलांंच्या दुस-या गटानेही जिल्हाधिका-यांसह अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांना लेखी निवेदन देवून दिशाभुल करणा-यांविरूध्द कार्यवाही करण्याची मागणी केली आहे..
“त्यामुळे सदर प्रकरण हे राजकीयदृष्ट्या सुडबुध्दीने ग्रासले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून प्रस्तावित दारूबंदी आंदोलनात सुरू असलेल्या एकूणच रंजक घडामोडींकडे पाहता दारूबंदी आंदोलनाने आता राजकीय वळण घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दारूबंदीचा अतिसंवेदनशील विषय आता दिवसेंदिवस अधिकच स्फोटक बनणार असून मागील काळात झालेल्या अनेक तक्रारींप्रमाणेच यावेळीदेखील सिंदखेड पोलीसांना अनेक तक्रारींचा तपास करावा लागणार हे जवळपास निश्चित असल्याचे राजकीय भाकीत जाणकार मंडळींकडून वर्तवण्यात येत आहे..”
एकंदरीतच राजकीयदृष्ट्या दारूबंदीचा विषय केवळ नावापुरताच असला तरी निवडणुकांच्या वेळी राजकीय मंडळींचा तारणहार म्हणून पुढे येणारी दारू आता “दारूबंदी” नामक आंदोलनात एकाकी पडली असून एकाकी पडलेल्या दारूला आता राजकीय मंडळी कितपत तारतात..? की या विषयावरूनही काही वेगळे राजकारण घडणार..? याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधान आले असून या संपुर्ण प्रकाराने वाई बाजारातील दारूबबंदीची हवा तात्पुरती का होईना मात्र ‘गुल’ झाल्याचेच दिसून येत आहे…