स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुर्वीच तालुक्यात ‘भावी’ उमेदवारांचा धुमाकूळ सुरू…!!
"वॉट्सप विद्यापीठातील 'पावरफुल नेता' ची पदवी अनेकांना प्रदान ; न छापल्या जाणा-या पिडीएफ् पेपर मधून समाजकार्य जोरात..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
आरक्षण वादामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे घोडे अद्याप न्यायालयाच्या तबेल्यात बांधलेले असताना, तालुकाभरातील अनेक भावी उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा घोडा चौफेर उधळल्याचे चित्र पाहायला मिळत असून वॉट्सप विद्यापीठातील ‘पावरफुल नेता’ ची पदवी अनेकांनी प्राप्त कल्यानंतर कधीही छापल्या न जाणा-या विविध पीडीएफ् पेपर मधून आपल्या समाजकार्याला जोरदार सुरूवात केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही..? हे निश्चित सांगता येत नसले तरी तालुक्यात मात्र ‘भावी’ जि. प. व. पं.स. उमेदवारांचा धुमाकूळ सुरू असल्याचे बोलके चित्र सध्या किनवट माहूर या दोन्ही तालुक्यात पहावयास मिळत आहे.

मागील काही वर्षांपासून आरक्षण वादातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या अवस्थेत सर्वश्रुत आहे. त्यात अनेक पुढारी ‘राजकीय बेरोजगार’ झाले आहेत. अशात परंपरागत राजकीय मंडळीप्रमाणेच हावशे, गवशे, नवशे देखील निवडणूक लढवण्यासाठी निवडमुकीच्या अधिकृत घोषणेकडे टक् लावून आहेत. परिणामी अधूनमधून येणा-या निवडणुकीच्या बातम्यांनी अचानक प्रकट होताना.. जणू कडक उन्हात हवेचा मधूर व थंड गारवा यावा अगदी त्याप्रमाणे निवडणुका अगदी जवळ येवून ठेपल्याच्या माहितीची एखाद्या बातमीरूपी थंड झूळूक भावी उमेदवारांना गदगद करून जात आहे. याच पार्शवभुमिवर किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातून निवडणुक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक भावी उमेदवार कमालीचे निवडणुक तयारीला लागले असून निवडणूक होणार की नाही याबाबत कुठलीही खात्री नसताना अनेकांनी स्वतःला “जनतेचा नैसर्गिक पर्याय” घोषित केले असल्याचे वास्तव सध्या ग्रामीण भागात दृष्टीपथास येत आहे. त्यामुळे संपुर्ण तालुकाभर “पुढचा मीच..!” अशा अतिआत्मविश्वासपूर्ण हालचाली सुरू झाल्याने जनतेसमोर हसावे की रडावे..? हा उपरोधात्मक प्रश्न येवून ठेपला आहे…

विशेष म्हणजे तालुक्यातील परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले दिग्गज आपल्या राजकीय परिपक्वतेचा परिचय देताना संयम ठेवून असल्याचे कुणीही नाकारू शकत नसले तरीही जो-तो पुर्वीची व आजची प्रत्यक्ष परिस्थिती हेरून आपल्या हक्कात आकडेमोड करून ‘समाधान’ माणत आहे. परंतू यावेळी मात्र परंपरागत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याच्या तयारीने अनेक भावी उमेदवारांपैकी कोणी शेती गहाण ठेवली…कोणी कर्ज काढले…कोणी बँकेत सीसी लिमिट वाढवली… काहींनी घरच्यांचा विरोध झुगारून थेट “आता राजकारणातच करिअर..!” असा जीवननिर्णय घेतला.. काहींनी तर यापुढे निवडमुकाच होमार नाहीत अशी खुणगाठ बांधून निवडणुकीसाठी चक्क सरकारी नोकरीचा राजिनामा देवून ‘स्वेच्छानिवृत्ती’ घेतल्याची जोरदार चर्चा आहे… गोष्ट एवढ्यावर थांबत नसून काही उमेदवारांनी गावातील एखाद्या टपरीवर चार जणांना चहा पाजला तरी लगेच सोशल मीडियावर पोस्ट पडताना.. “जनतेशी सुसंवाद… प्रचंड प्रतिसाद…!”, एखाद्या गावात पंधरा मिनिटं जाऊन दोन लोकांशी हस्तांदोलन केलं की लगेच कॅप्शन – “आज ऐतिहासिक जनआशीर्वाद दौरा संपन्न..!”… काहींच्या बाबतीत तर “भावी उमेदवार साहेबांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद” या पोस्ट जास्त प्रमाणात दिसत असल्याचे ग्रामस्थ हसत-हसत सांगत आहेत…
तथापि, काही इच्छुकांनी फोटो काढण्यालाच समाजसेवेचा अविभाज्य भाग बनवल्याचे दिसून येत असून अगदी मंदीरातील भक्तीभावाच्या फोटोपासून ते अंत्यविधीच्या हजेरीतील दुःखी मुद्रा, विवाह समारंभातील वर-वधूच्या मधोमध उभा राहून “आशीर्वाद” फोटो, तर रूग्णालयात एखाद्या रूग्णासमोर हात बांधून असलेल्या गंभीर मुद्रेतील फोटो काढण्याचा सपाटा लावल्याचे सोशल मिडीयावर दिसून येत आहे.. विशेष म्हणजे, हजेरी लावलेला कार्यक्रम संपण्याआधीच काहींचे फोटो व स्टेटस आधी अपलोड होत असल्याने “जुलमाची गर्दी, आणि स्वतःचे स्वागत.!” याची तंतोतंत प्रचिती येत आहे…
“एकंदरीतच वॉट्सअप विद्यापीठात अनेक भावी नेत्यांचा दबदबा आता चांगलाच वाढला असून, ‘आत्ता तावडीत आला रे.. म्हणणा-या कार्यकर्त्यांच्या संख्येेत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशात वाढत्या कार्यकर्त्यानी लावलेले ‘चणा-वृक्ष’ दिवसेंदिवस अधिकाधीक हिरवेगार बनत आहे. हिच बाब हेरून आकडेमोड आपल्याच हक्कात पडेल याची खात्री वाटून घेवून अनेक भावी उमेदवारांनी जि.प. व. पं.स. निवडणुकांसाठी कोणी शेती गहाण ठेवली…कोणी कर्ज काढले…कोणी बँकेत सीसी लिमिट वाढवली… काहींचे घरचा विरोध झुगारून राजकारणात करिअर..! तर निवडणुकीसाठी चक्क सरकारी नोकरीचा राजिनामा देवून ‘स्वेच्छानिवृत्ती’..? असे भन्नाट राजकीय व प्रायोजित कार्यक्रम समोर येत आहेत. त्यामुळे “भावी नेता मित्रमंडळ”, “जनआशीर्वाद परिवार”, “परिवर्तन युवा मंच”, “साहेब फॅन क्लब” असे डझनभर ग्रुप तयार करून दिवसभर “Good Morning” पासून “जय जनसेवा” पर्यंत मेसेजचा मारा सहन करताना, सोबतच संभाव्य निवडणूक अजून लागलेलीही नसताना तालुक्यातील अनेक भावी उमेदवारांनी मात्र तयारी, प्रसिद्धी, पोस्टरबाजी, स्टेटसबाजी, चहा-नाष्टा राजकारण आणि “जनतेचा आग्रह” मोहिमेद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक चौका चौकात चांगलाच हास्यकल्लोळ निर्माण केला असल्याने “प्रत्यक्ष निवडणुकीत जनतेेेने या भावी उमेदवारांना “बी.पी” च्या “गोळ्या” खाण्यास लावू नये म्हणजे पावलं..! अशी बोलकी व मनोरंजनात्मक प्रतिक्रिया जानकार मंडळींकडून दिली जात आहे….





