पारंपारिक पद्धतीला फाटा देत वाई बाजार येथील शेतक-याचा ‘तूर’ पिक लागवडीचा भन्नाट प्रयोग…
' घरगुती बियाणे वापरून हजारोंची बचत ; तुरीचे विक्रमी पिकाची शेतक-यास अपेक्षा'
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
पारंपारिक पिक पेरणीला फाटा देत येथील शेतक-याने केलेला तूर पीक पेरणीचा प्रयोग प्रचंड यशस्वी होताना दिसत असून घरगुती बियाण्यांचा वापर करून हजारो रूपयाची बचत करतानाच परिसरातील इतर शेतक-यांनीही असा प्रयोग करून कमी वेळेत व कमी खर्चात जास्त उत्पन्न प्राप्त करण्याचा हा अभिनव प्रयोग इतर शेतक-यांनी देखील करून पाहण्याचे आवाहन शेतक-याने केले आहे….
माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे आंध्र प्रदेशातील सुंड्रू व्यंकट नारायणा रा. कोट्टाला पल्ली ता. उदयगीरी जि. नेल्लोर हे ‘मक्ता’ तत्वावर शेती करतात. यासाठी मागील दहा वर्षांपासून ते मुळगाव सोडून वाईबाजार येथील शेतात आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. तथापि मक्ता तत्वावर शेती करताना शेतमालकाला दिली जाणारी रक्कम व शेतीसाठी लागणा-या इतर खर्चाचा ताळमेळ लावताना अनेक शेतक-यांची अक्षरश: तारांबळ उडत असतानाच सदर शेतक-याने तूर पिक लागवडीचा अनोखा प्रयोग करून परिसरातील इतर शेतक-यांचे लक्ष वेधले आहे…
सर्वसामान्यांच्या घरातील किमान एकवेळच्या जेवनात हमखास असलेल्या तूरडाळ (तूर) ची पेरणी शेतकरी प्रचलित व पारंपारिक पध्दतीनुसार जून ते जुलैमध्ये खरीप हंगामात करीत असतात. मात्र येथील सुंड्रू व्यंकट नारायणा या शेतक-याने सोयाबीन पीक काढणीला येण्यापुर्वी त्याच सोयाबीन पिकात दोन फुटाच्या अंतरावर तूर पिकाची लागवड कल्यानंतर त्यातून तूरीचे उप्पन्न मिळते किंवा कसे..? याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्क सोयाबीन पिकात तूरीची लागवड करून अनोखा पिकप्रयोग केला. तत्पुर्वी कृषी केंद्रावरील तूर बियाण्यांचा खर्च जास्त असल्याने प्रायोगीक तत्वावर त्यांनी घरात उपलब्ध असलेले तुरीचे घरगुती बियाणेच वापरले… दरम्यान पिकाची निगा घेताना एक वेळचे ‘निंदन’ दोन वेळ शेतातील विहरीतून पाणी व दहा दिवसाच्या फरकाने काही विशिष्ट किटकनाषके व पोषकतत्वे असलेल्या औषधांच्या सहा ते सात फवारण्या केल्या.. यातून आजमितीस तुरीचे भरघोस पिक शेतात डौलदार रूपात उभे असून अवघ्या काही दिवसात पिक काढणीला येणार आहे….
विशेष म्हणजे खरीप हंगामात याच पिकाची लागवड केल्यानंतर पिक काढणीस साधारणत: सहा ते सात महिण्यांचा कालावधी लागतो.. परंतू या प्रयोगातून चक्क पाचव्या महिण्यात पिक काढणीला आल्याने वेळेबरोबरच हमखास उत्पन्नाची हमी असल्याचेही संबंधित शतक-याने सांगितले आहे.. तर सदर शेतक-याने केलेल्या प्रयोगातून उभ्या असलेल्या पिकाकडे पाहता माहागडे बियाणे वापरण्यापेक्षा घरगुती बियाण्यांचा वापर करून मेहनत व चिकाटीने पिकांची काळजी घेवून जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी इतर शेतक-यांनी देखील हा प्रयोग करून पाहण्याचे आवाहन कृषीतज्ञांकडून केले जात आहे… एकंदरीतच वाई बाजार येथील शेतक-याने केलेला पीकप्रयोग भन्नाट यशस्वी होताना दिसत असून अडीच फुटाच्या अंतरावर दोन एकरातील तुर पिकातून किमान विस क्विंटल तूरीचे उत्पादन होणार असल्याची खात्री संबंधित शेतक-याने दिली आहे…