ईतर
माहूर तालुक्यातील माळरान भागात लाखो रूपये किमतीच्या मौल्यवान दगडांची (गारगोटी) तस्करी सुरू…
"चक्क 'जेसीबी' च्या साह्याने उत्खनन ; वनविभाग व महसूल प्रशासनाची संशयास्पदरित्या चुप्पी"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
नैसर्गीक संपत्तीचा वारसा लाभलेल्या माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील माळरान व वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या भागातून लाखो रूपये किमतीच्या मौल्यवान दगडांची खुलेआम तस्करी सुरू असून चक्क जेसीबीच्या साह्याने उत्खनन करून बिनदिक्कतपणे होत असलेल्या या तस्करीवर वनविभागासह महसूल प्रशासनानेही संशयास्पदरित्या चुप्पी साधल्याने मौल्यवान दगडांच्या तस्करीला दोन्ही विभागांची मुकसंमती असल्याची प्रचिती येत आहे..
माहूर तालुक्यातील वाई बाजारसह, गोकुळ, सायफळ, वानोळा, पानोळा, कासारपेठ, तुळशी, मलकागुडा याबरोबरच संपुर्ण माहूर तालुक्याला नैसर्गीक संपत्तीचा अमुल्य वारसा लाभलेला आहे. यात वनजमिनी तसेच माळरानात नैसर्गीकरित्या असलेले अमुल्य दगड अस्तित्वात असून या दगडांची (गारगोट्यांची) बाजारात मोठी किंमत मिळत असल्याचे सांगण्यात येते.. हिच बाब हेरून तालुक्यातील काही बड्या आसामींच्या माध्यमातून परराज्यातील काहीजण वाई बाजार येथे तळ ठोकून असल्याची कुजबूज सुरू आहे. दरम्यान “रात्रीस खेळ चाले” या उक्तीप्रमाणे तालुक्यातील वाई बाजारसह परिसर व संपुर्ण तालुक्यात रात्रीच्या वेळी चक्क जेसीबीच्या साह्याने उत्खनन करून हजारो क्विंटल मौल्यवान दगडााची (गारगोटी) तस्करी मागील अनेक महिण्यांपासून सुरू असून नायट्रोलाईट, अँपोफायलाइट, चँबाझाइट आदी प्रकारातील मौल्यवान दगडाची (गारगोटी) तस्करी खुलेआम सुरू असूनही याकडे संबंधित विभाग जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित विभाग मात्र संशयाच्या भोव-यात असल्याची प्रचिती सर्वसामान्यांना येत आहे..
विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक ठिकाणांहून साठवलेली गारगोटी कुठे व किती प्रमाणात याची तंतोतंत माहिती वन विभाग व महसूल विभागातील काहींना व असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.. तर दोन्ही विभागातील कर्मचारी व अधिका-यांच्या नाकावर टिच्चून मागील अनेक महिण्यापासून तब्बल पंचवीस टन गारगोटी भरलेली अनेक वाहने बिनदिक्कतपणे इच्छितस्थळी जात आहेत. त्यामुळे या प्रकाराकडे संबंधित विभाग जाणिवपुर्वक दुर्लक्ष का करीत आहे याबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नसून तस्कर व संबंधित विभागाच्या अर्थपुर्ण संबंधातून संपुर्ण तालुक्यातील व तालुक्याबाहेरील मौल्यवान दगडांची दर दोन दिवसांला परराज्यात व इतर ठिकाणी बिनदिक्कतपणे तस्करी करून तस्कर व अधिकारी आपले ‘उखळ पांढरे’ करून घेत असल्याची ओरड जनतेतून होत आहे..
या प्रकाराकडे वरीष्ठांनी तातडीने लक्ष देण्याची गरज असून वनविभाग व महसूल विभागाने संयुक्त पथके नेमून तालुक्यातील वनजमीनी, माळरान, तसेच त्या लगत असलेल्या नदीनाल्यांच्या परिसरातची प्रत्यक्ष पाहणी केल्यास साठवलेल्या हजारो क्विंटल गारगोटीचे साठे आढळून येतील.. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत निसर्गप्रेमी बांधवांकडून व्यक्त होत आहे…
“सदरचा गारगोटी तस्करी सुरू असल्याचा प्रकार अद्यापपर्यंत आम्हाला माहित नव्हता.. परंतू ही बाब जर खरी असेल तर संबंधित ठिकाणच्या सर्व वनपालांना मी लगेच आदेश देवून संबंधितांविरूध्द कारवाई करण्याच्या सुचना देणार आहे..रोहीत जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर

