नोकरी संदर्भबिझनेस
‘मेट’ सह संपुर्ण माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात “तुफान” वृक्षतोड….
"तोडलेले लाकूड मोठ्या प्रमाणात जमा ; विभागाकडून परिस्थिती न दिसल्याचा आव..!"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील ‘मेट’ सह संपुर्ण तालुक्यात परिसरात तुफान वृक्षतोड सुरू असून तालुक्यातील अनेक ठिराणी गैरी लाकडाचे मोठमोठे ढिगारे दिसत असूनही वनविभाग मात्र परिस्थिती माहित नसल्याचा आव आणत असल्याने वनप्रेमींकडून संताप व्यक्त करताना अवैध लाकूडतोड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे…
उन्हाळ्याची चाहूल लागून शेतातील पिके संपल्यानंतर तालुक्याबरोबरच बाहेरचे अवैध लाकूडतोडे कमालिचे हरकतीत आले असून संपुर्ण माहूर तालुक्यातील वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे विदारक चित्र सध्या पहावयास मिळत आहे… विशेषत: माहूर तालुक्याचा बहुतांश परिसर हा घनदाट जंगल व पहाडी म्हणून प्रसिद्ध आहे.. परंतू माहूर तालुक्यातील घनदाट जंगलासंबंधीची वर्तमान परिस्थिती पाहता जंगल व परिसर अत्यंत विरळ होत चालल्याचे भयान वास्तव असून वनविभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे अवैध लाकूड तोड्यांचा “सुवर्णकाळ” आल्याचे दिसून येत आहे. तथापि माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत असलेल्या अनेक गावात बहूमुल्य सागवानासह लिंब, अंजन, चिंच, धावंडा, काटशेवरी, रोहन, मोह अशा अनेक गैरीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्याच मुकसंमतीने सदरचा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे लाकूडतोड्यांकडून प्रत्यक्ष बोलले जात आहे… त्यामुळे “अवैध वृक्षतोड जोमात अन् वनविभाग मात्र कोमात” अशीच परिस्थिती दिसून येत आहे.
असाच प्रकार तालुक्यातील मेट ते उमरा रोडलगत असलेल्या नाल्यांसह तालुक्यात अनेक ठिकाणी दिसून येत असून मेट येथील महामार्गाकडे जाणा-या दक्षिण ते उत्तर वाहणा-या नाल्यातील शेकडो झाडांची दिवसाढवळ्या कत्तल करून तोडलेल्या लाकडाचे ट्रक वाहतूक पास नसतांनाही वनविभागाच्या नाक्यावरून बिनदिक्कतपणे कसे काय पास होतात..? याबाबत अनेक प्रकारच्या चर्चांना उधान आले असून वनविभागाच्या नाक्यावरून गैरी लाकूड घेवून जाणा-या प्रत्येक वाहनाला तब्बल तीस हजाराची रक्कम लावण्यात आल्याचीही स्फोटक चर्चा जनतेतून उघडपणे बोलले जात आहे. तर याविषयी वनविभागाच्या अघिकारी व कर्मचा-यांशी विचारणा केली असता घडत असलेला प्रकार चक्क माहितीच नाही…. माहिती घेवून सांगतो… चौकशी करतो…. अशी अपुर्ण स्वरूपाची उत्तरे वनविभागाच्या जबाबदार अधिकारी व कर्मचा-यांकडून दिली जात आहेत..
“विशेष म्हणजे वृक्षसंवर्धनासाठी दरवर्षी शासनाकडून मोठा गाजावाजा करून वृक्ष लागवड केली जाते. तर वृक्ष संवर्धनावर देखील कोट्यावधींंचा खर्च करण्यात येतो. मात्र वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली जात नाही. हे आदिवासी बहूल माहूर तालुक्याचे दुर्दैव असून माहूर रेंज मध्ये होत असलेल्या या गैरप्रकारावर उपवन संरक्षक नांदेड यांनी तातडीने पथक पाठवून तपासणी करावी. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमी बांधवांसह जनतेतून होत आहे……