नोकरी संदर्भक्राइम
खळबळजनक..! “समज देऊनही नाही सुधारला…! पंचायत समिती किनवटमध्ये ‘वसुली’चे धंदे सुरूच?”
"घरकुल लाभार्थ्यांकडून दोन ते पाच हजारांची कथित मागणी ; कार्यालयातच पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रशासनाची अब्रू वेशीवर"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
गरीब, वंचित आणि गरजू नागरिकांसाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असताना, पंचायत समिती किनवटच्या बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या एका कंत्राटी बांधकाम अभियंत्यावर घरकुल व इतर योजनांच्या लाभार्थ्यांकडून कामे करून देण्यासाठी दोन ते पाच हजार रुपयांची कथित मागणी केल्याचे व लाभार्थ्यांकडून चक्क कार्यालयात पैसे घेतल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरत असल्याचा गंभीर विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
यातील धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना यापूर्वीच देण्यात आल्याची चर्चा आहे. तर एकवेळ संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला चक्क गटविकास अधिका-यांच्या दालनातच झाप.. झाप.. झापून समज देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, संबंधित कर्मचा-याच्या एकूणच वर्तणुकीतून “समज” हा उपाय फोल ठरला की काय..? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, चालू आठवड्यात संबंधित कंत्राटी अभियंता कार्यालयातच एका लाभार्थ्याकडून पैसे स्वीकारत असल्याचा दावा करणारा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे पंचायत समितीच्या कारभारावर गंभीर संशय निर्माण झाला आहे. जर व्हिडिओतील घटना खरी असेल, तर संबंधितावर तात्काळ निलंबन अथवा गुन्हा दाखल करण्याची कारवाई का झाली नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून घरकुल योजना ही गरीबांना सन्मानाने निवारा मिळावा म्हणून आहे; परंतु त्याच योजनेच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याचे केवळ आरोपच नाही तर चक्क व्हिडीओ वायरल होत असतील, तर हा प्रकार केवळ भ्रष्टाचाराचा नाही, तर गरीबांच्या हक्कांवर उघडपणे घाला घालणारा असल्याची भावना जनतेत आहे…
“विशेष म्हणजे प्रकरणात केवळ संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याचीच नव्हे, तर त्याच्या विरोधातील तक्रारी असूनही वेळेवर कठोर कारवाई न करणाऱ्या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद असून या सर्व प्रकाराच्या संपुर्ण चौकशीची मागणी जोर धरत असतानाच हा प्रकार वरीष्ठ अधिका-याच्या “मूक संमतीमुळे तर बिनधास्त सुरू नाहीत नां..?” हा प्रश्न आता सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. तथापि, केवळ एक दोन नव्हे तर लाभार्थ्यांपैकी तब्बल सहा ते सात जन पुढे येवून संपुर्ण पुराव्यासह येत्या दोन दिवसात लाचलुचपत विभागाबरोबरच वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार असल्याची बाब समोर आली असून तक्रारीअंतीच संबंधित तक्रारदार व ‘तो’ कंत्राटी कर्मचारी नेमका कोण..? याबाबतचा जाहीर खुलासा होणार आहे. परिणामी संबंधितांवर नेमकी काय व कोणती कार्यवाही होते याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, प्रशासन केवळ चौकशीचे आश्वासन देवून संबंधित कर्मचा-याला पाठीशी घालणार..? की प्रत्यक्ष कठोर कारवाई करून जनतेचा विश्वास परत मिळवणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे…





