‘शिक्षकाची बदली करा अन्यथा ध्वजारोहणच करणार नाही…?’
"माहूर तालुक्यातील मुरली येथील पालकांचा आक्रमक पवित्रा..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेच्या कार्यरत असलेल्या शिक्षकाची बदली करा..अन्यथा ध्वजारोहणच करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेवून शिक्षण विभागाचे वाभाडे काढण्याचा खळबळजनक प्रकार माहूर तालुक्यातील मौजे मुरली येथील पालकांनी दिलेल्या निवेदनातून समोर आला असून कार्यरत असलेल्या शिक्षकाची इतरस्त्र ठिकाणी बदली करून त्याठिकाणी दुसरा पर्यायी शिक्षक रूजू होणार नसेल तर उद्याच्या ध्वजारोहणाला जाणारच नसल्याचे निवेदन प्रशासनाकडे सादर केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे….
माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरली येथील वादग्रस्त शिक्षकाच्या बदलीसाठी पालक ग्रामस्थ सरसावले असून येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत त्या शिक्षकाची इतरत्र व्यवस्था करून पर्यायी शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास ता.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजाहरणाला शाळेतील विद्यार्थी,गावातील पालक व ग्रामस्थ जाणार नसल्याची भूमिका घेतल्याने माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील भोंगळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरली येथील शिक्षक बालाजी केंद्रे यांची तात्काळ बदली करून कर्तव्यनिष्ठ शिक्षकाची नियुक्ती करणे बाबतचे निवेदन पालक,ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे, त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने कारवाई करून वादग्रस्त शिक्षक केंद्रीय यांची बदली करून पर्यायी शिक्षकाची व्यवस्था न केल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी गावातील कोणताही विद्यार्थी व गावातील कुणीही नागरिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही असा आक्रमक पवित्र घेतला असून सदरहू वादग्रस्त शिक्षक विद्यार्थ्यांच्या तासिका व्यवस्थित घेत नसल्याने विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे,शाळेत कुठलेही शैक्षणिक उपक्रम राबवित नाही,मध्यानं भोजन व इतर अनुषंगिक बाबीकडे दुर्लक्ष करतो,पालक वर्गाने शाळेतील अनियमित ते संदर्भात जाब विचारल्यास उद्धटपणे वागतो,असे आरोप संबंधित शिक्षकाविरुद्ध करण्यात आलेले आहेत.यापूर्वीही या शाळेत शिक्षकांमधील बेबनावामुळे एका शिक्षकाला प्रतिनियुक्तीवर पाठविण्याची कार्यवाही शिक्षण विभागाने तत्परतेने केली होती,मात्र त्या वादग्रस्त शिक्षकाला येथेच कायम केल्याने दररोज नवनवीन वाद निर्माण होत आहे. शिक्षण विभागासह, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर गावातील अनेक पालक,ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
◼️ कर्तव्यनिष्ठ गटशिक्षणाधिकाऱ्याची गरज..!
माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागात सध्या ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ असा कारभार सुरू असून आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या पुढारी शिक्षकांना मागेल त्या ठिकाणी प्रतिनियुक्ती दिली जात असल्याचा थेट आरोप करत विद्यमान गटशिक्षणाधिका-यांच्या काही कॉल रेकॉर्डींगच्या ऑडिओ क्लिपसोबतच काही काही विशेष पुरावे असल्याचेही नाव न सांगण्याच्या अटीवर काही शिक्षणक्षेत्रातील लोकांनी आमच्या वृत्तवाहिनीसमोर पुराव्यासह बोलून दाखवले आहे… त्यामुळे माहूर तालुक्यातील संपुर्ण शिक्षणव्यवस्था केवळ आणि केवळ ॲडजस्टमेंट वरच सुरू असून परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिदुर्गम, आदिवासी व बंजारा बहुल भाग असलेल्या माहूर तालुक्यातील शिक्षण विभागात ढेपाळलेला कारभार सुरळीत करण्यासाठी प्रभारी गटशिक्षण अधिकाऱ्याऐवजी कर्तव्यनिष्ठ गटशिक्षणाधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे….
“विशेष म्हणजे शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी वाई बाजार केंद्रांतर्गत येणा-या वाई तांडा येथील चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेवर शिक्षकच नसल्याने व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात शिक्षकाविना एकटेच “खो-खो” नामक खेळ खेळत असल्याच्या पार्श्वभुमिवर पालकांनी तेथील शाळेला कुलूप लावले होते… त्यावेळी माहूरचे गटशिक्षणाधिकारी प्रत्यक्ष हजर झाल्यानंतर पालकांनी तेथे शिक्षकच नसल्याने आपल्या वेदनाही बोलून दाखवल्या होत्या…. परंतू, “शिक्षकच नसेल तर मी काय शिक्षक जन्माला घालू का…?” असा अजब गजब प्रश्न माहूरच्या गटशिक्षणाधिकारी महोदयांनी पालकांना विचारून आपल्यातील काही विलक्षण लक्षणे दाखवल्यानंतर पालकांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी महोदयांचे यथेच्छ स्वागत होईल असाही तेथील पालकांनी कार्यक्रम आखला होता. परंतू, उपस्थित पत्रकारांनी वेळ नसल्याचे कारण सांगितल्यानंतर तो कार्यक्रम रद्द झाला… तथापि, पालकवर्गाचा संताप लक्षात घेवून अगदी काही मिनिटात त्याठिकाणी दोन शिक्षक पाठवल्याने तो प्रश्न मिटला…!!! परंतू, असे असले तरीही माहूर तालुक्याच्या शिक्षणविभागाचा कारभारच “सेटींग किंग” व सेटींगसाठीच कार्यरत असलेल्या एका बिनकामाच्या व्यक्तीच्या हातात असल्याने माहूर तालुक्याच्या शिक्षणक्षेत्रात अशा स्वरूपाचे प्रकार घडत असल्याचा आरोप जाणकार शिक्षणप्रेमी मंडळीकडून होत असून मुरली येथील प्रकार देखील त्याच स्वरूपाचा तर नाही नां..? याबाबतच्या अनेक चर्चांना उधान आले आहे……





