ईतर
लक्की स्टोन क्रेशर वरील तहसील प्रशासनाची ‘ती’ कारवाई वादाच्या भोव-यात..! ; मंडळ अधिका-यांना दिसलेली 2500 ब्रास गिट्टी ‘ईटीएस’ मोजणीत मात्र 244 ब्रास…?
"राजकीय दबावातून घेतलेला निर्णय संबोधून तहसीलदारांच्या 'त्या' निर्णयाविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल...!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
मागील सहा वर्षांपासून बंद असलेल्या रूपला नाईक तांडा येथील लक्की स्टोन क्रेशर वरील माहूर तहसील प्रशासनाच्या ‘त्या’ कारवाईवर आता संशयाचे ‘ढग’ जमा झाल्याचे दिसून येत असून मंडळ अधिका-यांना दिसलेली तब्बल 2500 ब्रास गिट्टी प्रत्यक्षात मात्र ‘ईटीएस’ मोजणीत केवळ 244 ब्रास आढळून आल्यानंतर प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाची ढवळाढवळ झाल्याची दाट शक्यता व्यक्त करून राजकीय दबावातून घेतलेल्या तहसीलदारांच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात आता उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आल्याने प्रकरणास नवीन वळण मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे..
माहूर तालुक्यातील मौजे रूपला नाईक तांडा येथील खडी केंद्र चालक कादर खान पठाण यांच्या मालकीचे लक्की स्टोन क्रेशर सन 2020 पासून बंद असून परवाना नुतनीकरणाची फाईल जिल्हाधिका-यांच्या दालनात प्रलंबित आहे. दरम्यान दि. 18 मार्च 2026 रोजी माहूर तहसिलदारांनी खडी केंद्र चालक कादर खान पठाण व बांधकाम गुत्तेदार फिरोज खान पठाण यांचे वर अवैध उत्खनन करून शासनाचा महसुल बुडविल्याचा ठपका ठेवून तब्बल १ कोटी ९९ लाख ३५ हजार एवढ्या रकमेचा दंड ठोठावताना दंडात्मक कारवाई केली होती..
तत्पुर्वी, दि. 9 जानेवारी 2026 रोजी मंडळ अधिकारी सिंदखेड तसेच ग्राम महसूल अधिकारी तुळशी यांनी पंचासमक्ष केलेल्या पंचनाम्यानुसार त्यावेळी लकी स्टोन क्रेशर हे बंद अवस्थेत होते. तर परिसरात दोन ते अडीच हजार ब्रास विविध प्रकारची खडी उपलब्ध असल्याचेही पंचनाम्यात नमूद आहे. परंतू, पंचनाम्यातील अत्यंत महत्वाची नोंद म्हणजे सदरील खडी ही खान कंन्स्ट्रक्शन ने भाडेतत्वावर घेतली असून भाडेतत्वावर घेतलेल्या जागेवर ‘हॉट मिक्स’ साठी साठा करण्यासाठी भाडे तत्वावर दिल्याची नोंद पंचनाम्यात केली आहे. एवढेच नव्हे तर वरील दोन ते अडीच हजार ब्रास हा आकडा केवळ अंदाजित अकडा असून त्याची इटीएस मोजणी करणे योग राहील. असा खुलासा देखील या पंचनाम्यात केला होता. दरम्यान दि. 17 मार्च 2026 रोजी भुमी अभिलेख कार्यालयाकडून दिलेल्या अहवालात इटीएस मोजणीत 244 ब्रास साठा असल्याचे माहूर तहसिलदारांना सांगण्यात आले. असे असतानाही माहूर तहसीलदारीनी दि. 18 मार्च रोजीच्या आदेशात उपलब्ध 244 ब्रास खडीच्या दहापटीपेक्षाही जास्त दंड ठोठावताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींचे अनुपालन न करता केवळ राजकीय दबावापोटी सदरचा आदेश पारीत केल्याचा अपिलार्थी कादरखाँन उस्मानखाँन व फिरोज खाँन उस्मान खाँन यांनी माहूर तहसीलदारांवर थेट आरोप केला असून माहूर तहसीलदारांच्या आदेशाविरोधात उपविभागीय अधिकारी किनवट यांच्या न्यायालयात दि. 1 एप्रिल रोजी अपिल दाखल केले आहे..
विशेष म्हणजे एरव्ही रेतीचोरांनी साठवलेल्या शेकडो व हजारो ब्रास रेती साठ्यांना दोनअंकी दाखवून रेतीतस्कारांचे हित जोपासताना महसूल विभागातील अनेक तथाकथीत तलाठी व मंडळ अधिका-यांना जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे. एवढेच नव्हे तर अगदी काल परवापासून सुरू झालेल्या रेतीघाटांवरील रेती किती..? कुठे..? कशी..? व नेमकी कशा प्रकारच्या पावत्यांनी जात आहे..? याची पुरेपूर कल्पना असताना महसुल कर्मचारी ‘आनंदाचा शिधा’ घेवून गप्प आहेत. परंतू, इटीएस मोजणीत केवळ 244 ब्रास खडी दिसून आलेली असताना त्याच्या दहापट म्हणजेच तब्बल 2500 ब्रास खडी महसुली कर्मचा-यांनी नेमकी कोणत्या चष्म्याने बघितली..? हे एक कोडे बनले असून याप्रकरणी महसुली कर्मचा-यानी जपलेले स्व:हीत की राजकीय हित..? याबाबत अनेक प्रश्नांना आता पेव फुटले आहे… तर याप्रकरणी आज दि. 5 रोजी माहूर तहसीलदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या प्रतिक्रिया प्राप्त होवू शकल्या नाहीत..
“उस्मान ला आसमान दाखविण्याचे स्वप्न बाळगणा-यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…!“ – हाजी उस्मान खाँन पठाण…
– याप्रकरणी वाई बाजारचे उपसरपंच तथा अपिलार्थींचे पिता हाजी उस्मान खाँन पठाण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, सदरचे प्रकरण केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरीत असून ‘उस्मान’ ला ‘आसमान’ दाखवण्याच्या प्रयत्नात काही लोकांनी मिळून केलेला खटाटोप असल्याचे सांगताना.. समोरच्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांचे स्वप्न धुळीत मिसळल्याशिवाय ‘उस्मान’ ही गप्प बसणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ दिली..– हाजी उस्मान खाँन पठाण, उपसरपंच वाई बाजार,
– बाहेरून आणलेल्या २४५ ब्रास गिट्ठी साठ्याच्या पावत्या मी तहसीलदार यांचे कडे सादर केल्या शिवाय ई टी एस मोजणीचा अहवाल ही त्यांचे कडे उपलब्ध आहे. तरी सुद्धा स्पष्ट पुरावे नाकारून कारवाई करणे हे चुकीचे आहे. तक्रारदाराने खोडसाळ पणाने तक्रार करीत राजकीय वजन वापरून प्रशासनाला कामी लावले.– फिरोज खान पठाण, शासकीय गुत्तेदार, खान कन्स्ट्रक्शन कंपनी वाई (बाजार)





