हिंगोली लोकसभेची निवडणूक महागाई, शेतमाल भाव व बेरोजगारीच्या कचाट्यात…
"जनमताचा कौल कळेना ; उमेदवारांची अग्नीपरिक्षा..!"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांना ओळखीचे असलेले कमळ, पंजा व घड्याळ चिन्ह बाद तर तिन्ही प्रमुख उमेदवार एकेकाळी मूळ शिवसेनेचे असल्यामुळे आता माझा कुणाला म्हणू असा प्रश्न सुजाण मतदारांना विचार करावा लागणारा असून विकास प्रश्नावर आधारित निवडणुकीत महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर महायुतीचे बाबुराव कदम,तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बि.डी.चव्हाण हे आपले भाग्य आजमावत आहेत..
हिंगोली लोकसभेत एकूण उमेदवार 33 असले तरी मूळ शिवसैनिक वगळता बाकीचे ३० काय दिवे लावतील..? जनतेच्या मनातील हा प्रश्न आजही अनुत्तरीतच असून जनता जनार्दनाचा कौल नेमका कुणाच्या पारड्यात पडतो..हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..
बहुचर्चित हिंगोली लोकसभा मतदारसंघात अंदाजे मतदान संख्या १८ लाख असून त्यात जातीनिहाय विचार केल्यास ५ लाख मराठा, ३ लाख बंजारा, २ लाख बौद्ध, २ लाख मुस्लिम, दीड लाख धनगर, असे १२ लाख मतदार वगळून बाकीचे ६ लाख निव्वळ ओबीसी आहेत. नुकत्याच पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पाहता हिंगोली मतदार संघात देखील मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास प्रमुख ३ उमेदवारांचे भाग्य समजावे लागेल.. त्यामुळे होणारे संभाव्य मतदान १० लाख गृहीत धरले तरी १ लाख मते सर्व अपक्षांनी मिळवली तर उरलेले केवळ ९ लाख मतदान या प्रमुख तीन राजकीय पक्षाच्या झोळीत पडणार आहे.. अशात मतदानासाठी उदास असलेल्या मतदारांना प्रशासकीय यंत्रणा मतदान करण्याविषयी जनजागरण करीत असल्याने मतदानाचा टक्का थोडा बहुत वाढण्याची शक्यता असली तरी हिंगोली मतदारसंघात दखल घेण्याजोगा तसेच रोजगार मिळवून देणारा एकही उद्योग गेल्या ७५ वर्षात एकाही राजकारण्याने न आणल्यामुळे हिंगोली लोकसभेतुन अंदाजे १ लाख मतदार कामाच्या शोधात मोठ्या शहरात स्थलांतरित झाले आहेत.. त्यांचा कल काय राहील याचे उत्तर येणारा काळच देणार असून औद्योगिक विकास शून्य.. शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव.. बी बियाण्यांचे गगनाला भिडलेले भाव.. शेतमजुरांची फरफट.. बेरोजगार उमेदवाराच्या भोवती फिरत असून राजकीय नेते मात्र जातीय गणिताच्या माध्यमातून तुंबळ राजकीय युद्ध करीत आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी जंगजंग पछाडत असल्याचे प्रचारातून दिसून येत आहे…
विशेष म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कौल नेमका कुठे राहील याचा अंदाज येत नसल्याने ओबीसी मतांच्या जोरावर निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी जंग जंग पछाडत असलेले वंचितचे बि.डी. चव्हाण मात्र अठरापगड ओबीसी समाजाच्या मतांच्या भरवशावर प्रचारात आघाडी घेतल्याचे सध्यातरी दिसत आहे…