बिझनेस

किनवट – माहूर तालुक्यात इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांत फेरफार करून ग्राहक व शेतक-यांची लूट…..

"शेतक-याचा घरच्या वजनातील 958 किलो कापूस वाई बाजार येथील व्यापा-याच्या काट्यावर भरला 875 किलो.."वाई बाजारसह संपुर्ण व्यापा-यांचे काटे तपासण्याची गरज"

 

 

किनवट/माहूर
इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात फेरफार करून शेतक-यांसह ग्राहकांची लूट करण्याचा फंडा वाई बाजारसह संपुर्ण किनवट-माहूर तालुक्यात लुटारू व्यापा-यांकडून राबवला जात असून वैधमापणशास्त्र विभागातील अधिका-यांच्या जाणिवपुर्वक दुर्लक्षामुळे शेतकीमाल खरेदीच्या नावाखाली व्यापा-यांचे चांगभले तर शेतकरीवर्ग अधिकच दारिद्र्याच्या खाईत लोटला जात असल्याचे भयान वास्तव सध्या संपुर्ण किनवट-माहूर तालुक्यात दिसून येत आहे…

 

 

शेतकीमाल खरेदी करणा-या व्यापा-यांसोबतच किराणा दुकान, सोन्याचांदीचे दुकान तसेच अगदी भंगार खरेदी करणा-या व्यापा-यांकडे देखील आज इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असून याकाट्यांमुळे फसवणुकीची भीती नसल्याचा भ्रम सर्वसामान्यांना आहे…परंतू दोन्ही तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक काट्यांची वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिका-यांनी स्पेशल टिम बनवून तपासणी केल्यास दोन्ही तालुक्यातील तब्बल ५० टक्क्यांच्या वर काट्यांमध्ये दोष आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही व्यापा-यांकडूनच सांगण्यात आली आहे..

 

 

   विशेषत: दिवाळीच्या मुहूर्तावर ग्रामीण भागात माहेरवाशीनी माहेरी आल्याने त्यांचा पाहूणचार करण्यात सध्या शेतकरी राजा व्यस्त आहे. यासाठी काबाडकष्ट करून शेतात पिकविलेला शेतमाल घरखर्च भागवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात व्यापा-यांकडे विकून आपली तात्पुरती गरज भागवत असतो.. अशात वाई बाजारमधील एका शेतक-यांने सांगितलेला धक्कादायक प्रकार हा थक्क करणारा असून त्याने घरी वजन करून ठेवलेला 958 किलो कापूस वाई बाजारातील एका कापूस विक्रेत्याकडे विक्रीली नेला असता तोच कापूस चक्क 875 किलोच भरला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे… याप्रकरणी तक्रार करण्यास सदर शेतक-याने असमर्थता दर्शविली असून तक्रार केल्यास चांगल्या संबंधाचा हवाला देत व्यापा-यांकडून व कृषी केंद्रांकडून मिळणारी उसनवारी तक्रार केल्याने पुन्हा मिळणार नसल्याची भितीही संबंधित शेतक-याने वर्तवली आहे…

 

 

 

विशेष म्हणजे २००९ च्या लीगल मेट्रोलॉजी कायदा आणि त्याचे लीगल मेट्रोलॉजी रूल्स २०११ नुसार वजनकाट्यासंबंधात वजनमाप निरिक्षकाने दिलेले प्रमाणिकरणाचे प्रमाणपत्र वजन काटा ठेवलेल्या जागी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. सोनेचांदीचा व्यवसाय करणा-या सराफ मंडळींनी किमान क्लास वर्ग दोनचे वजनकाटे वापरण्याचा कायद्याचा दंडक असून डिजीटल काटे हे सिल केलेले असणे अत्यावश्यक आहे.. असे असतानाही वरील बाबींपासून ग्राहक व शेतकरीवर्ग आजही अनभिज्ञ असून व्यापा-यांचे वजनकाटे तपासण्यास येणारी अधिकारी मंडळीदेखील एका ठिकाणी बसून व्यापा-यांकडून “मोठ्या वजनाची पाकीटे” घेवून जात असल्याचे सांगण्यात येत आहे…

 

 

 

ही बाब वजनमापशास्त्र विभागांतर्गत येत असल्याने हा विभाग नेमका कुठे व कसा कार्य करतो याबाबत सर्वसामान्यांना यत्किंचितही माहीती नसून या विभागाचे अधिकारी येतात कधी..? आणि जातात कधी..?? याचा सर्वसामान्यांना थांगपत्ताही लागत नाही.. त्यामुळे शेतकरी व ग्राहकांच्या व्यापा-यांकडून होत असलेल्या लुटीस व्यापा-यांबरोबरच संबंधित विभागाचे अधिकारीदेखील तितकेच जबाबदार असून जिल्हाधिका-यांनी सदर प्रकरणी स्वत: लक्ष घालून पोलीस विभागाच्या देखरेखीखाली वाई बाजारसह संपुर्ण किनवट-माहूर तालुक्यातील  व्यापा-यांच्या वजनकाट्यांची तपासणी करावी..तसेच वजनकाट्यात फेरफार करून लूट करणा-या व्यापा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी रास्त मागणी शतकरी व सर्वसामान्यांतून होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close