राजकिय
राजकीय स्टंटबाजीने माहूर पुन्हा एकादा पेटण्याच्या अवस्थेत..
"पत्रकार सरफराज दोसाणी यांच्यावर खंडणीचा तर डॉ. निरंजन केशवे यांच्यावर लुटमारीचा गुन्हा दाखल.."
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
राजकीय स्टंटबाजीने माहूर पुन्हा एकदा पेटण्याच्या अवस्थेत दिसून येत असून राजकीय व निरर्थक स्टंटबाजीतून पत्रकार सरफराज दोसानी यांच्यावर खंडणीचा तर डॉ. निरंजन केशवे यांच्यासह चौघांवर लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रस्त्यावर उतरणारे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र ‘बळीचा बकरा’ बनले असून गैरकायद्याची मंडळी जमवून रस्त्यावर उतरलेल्या तब्बल ७७ कार्यकर्त्यांवरही माहूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याने माहूर शहर पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या पेटण्याच्या अवस्थेत येवून ठेपल्याचे संकेत मिळत आहेत.
अत्यंत नाटकीय घडामोडींतून समोर आलेल्या या विचित्र प्रकरणात माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले व काँगेसच्या वैद्यकीय सहाय्यता विभागाचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे यांनी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माहूर येथील पुण्यनगरी प्रतिनिधी सरफराज दोसानी यांनी दि. ८ ऑक्टो. रोजी पेपरला बातमी न लावण्यासाठी ५० हजार रूपयाची खंडणी मागीतली असून खंडणी न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिली. यावरून पत्रकार दोसानी यांच्यावर माहूर पोलीसांत कलम ३८५, ५०६ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
दुसरीकडे पत्रकार सरफराज दोसानी यांच्या तक्रारीनुसार नवरात्रोत्सव काळात ‘माहूरचे ग्रामीण रूग्णालय सलाईनवर’ या मथळ्याखाली दि. ३० सप्टेंबर रोजी व दि. ३ ऑक्टोबर रोजीची ‘माहूर ग्रामीण रूग्णालयात आरोग्य सेवेची एैसी-तैसी’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. अशात दि. ८ ऑक्टोबर रोजी दु. १२ च्या सुमारास ग्रामीण रूग्णालयात रक्तदाब तपासण्यासाठी गेलो असता तेथे डॉक्टर दिसून आले नाही. याबाबत डॉ. अंबेकर मँडम यांना विचारणा केली असता त्यांनी OPD करून डॉक्टर गेले असल्याचे सांगीतले. त्यावेळी डॉक्टरांना केलेला संपर्क व प्रकाशित केलेल्या बातम्यांचा राग मनात ठेवून डॉ. निरंजन केशवे यांच्यासह अमोल केशवे, घनशाम केशवे तसेच शंकर ठाकरे यांनी त्यांच्या माहेर कलेक्शन नावाच्या कापड दुकानासमोर येवून तसेच त्यांच्या जवळच्या व्यक्तीला दुकानात घुसवून तोडफोड करण्याच्या इराद्याने हातात दगड घेवून वरील चोघांनीही दुकानातील गल्ल्यातील अंदाजे ५० ते ६० हजार रू. जबरीने काढून घेतले व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बस स्टॉप कडे निघून गेले. अशा फिर्यादीवरून डॉ. निरंजन केशवे यांच्यासह अमोल केशवे, घनशाम केशवे व शंकर ठाकरे यांच्यावर कलम ३९२, ५०६, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे..
त्याचवेळी पो. काँ. सुशिल गोपीचंद राठोड यांनी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शहरात दु. साडेतीनच्या सुमारास पेट्रोलींग करत असताना विनोद सुर्यवंशी यांनी माहिती दिली की, काही लोक एकत्र जमून रस्ता अडऴून घोषणा देत आहेत. तेंव्हा आम्ही सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता जमलेल्या पैकी एक इसम म्हणाला की डॉ. निरंजन केशवे यांना पत्रकार सरफराज दोसानी याने खंडणी मागीतली असून जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करून FIR करणार नाही तोपर्यंत रास्तारोको आंदोलन चालू राहणार आहे. अशा घोषणा दिल्याने डॉ. निरंजन केशवे यांच्यासह घनशाम केशवे, अमोल केशवे, सोनू राठोड, द.म. देशमुख, जगदीश वडसकर, अरविंद खंदारे, जमीर नागपूरकर, अविनाश कदम, अभि कदम, देवानंद जाधव, अनंता कलाणे, सोनू मोरे, राम काळे, विठ्ठल अडकीने, प्रविण काळे तसेच इतर ५० ते ६० लोकांनी बसस्थानक चौकात गैरकायद्याची मंडळी जमवून येण्या-जाण्यास मज्जाव केल्याने त्यांच्याविरूध्द कलम ३४१, १४३ भादवि व सहकलम १३५ म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
“एकंदरीतच डॉ. निरंजन केशवे यांचा खंडणीचा आरोप व पत्रकार दोसानी यांचा लुटमारीचा आरोप यातील तथ्य किती..? का यापाठीमागे दुसरेच काही कारण आहे..?? जनतेसह समर्थकांना हा निव्वळ मुर्ख बनवण्याचा तर प्रकार नाही ना..??? आदी उपस्थित होत असलेले सर्व प्रश्न संशोधनाचा विषय असला तरी राजकीय स्टंटबाजीतून पेट घेत असलेल्या या प्रकारणा माहूर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र “बळीचा बकरा” बनणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे…!”

